सातारा: रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन १९९० पासून ( शिवाजी नगर ) फलटण, रिंग रोड येथील असलेला नामफलक आज तिथीनुसार जयंतीदिनी पुन्हा एकदा पालिका प्रशासनाच्या सहकार्याने दिमाखात उभा करण्यात आला. अजिंक्य सहयाद्री वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमाचे संस्थापक संपादक सम्राट गायकवाड यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून नामफलक उभा राहिल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले.
मंगळवार तिथीनुसार जयंतीदिनी शिवसेनेचे ( ठाकरे गट) फलटण तालुकाप्रमुख विकास नाळे यांच्या हस्ते नामफलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अजिंक्य सह्याद्रीचे संपादक सम्राट गायकवाड, पिनु शिंदे, अंकुश जाधव, राजू खांडेकर, भिसे सरं यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तत्कालीन नगरसेवक तुकाराम गायकवाड यांनी पालिका सर्वसाधारण सभेत ठराव मांडून क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते रिंगरोड परिसराला शिवाजी नगर नाव देण्याचा ठराव संमत केला होता. तेव्हापासून हॉटेल मधुदिप समोर शिवाजी नगर नावाचा फलक दिमाखात उभा होता. मात्र, गेल्या आठ वर्षापूर्वी रस्ता कामा दरम्यान फलक काढण्यात आल्याचे स्थानिक नागरिक सांगत होते. त्यामुळे आता महाराजांच्या नावाच्या तीन प्रवेशद्वारावर स्वागत कमानी उभारण्याची मागणी सातत्याने अजिंक्य सह्याद्रीचे संपादक सम्राट गायकवाड फलटण पालिका प्रशासनाकडे करित होते. येत्या काही कालावधीत तिन्ही प्रवेशद्वारावर स्वागत कमानी उभा होणार आहेत. मात्र,किमान महाराजांच्या जयंतीदिनी फलक उभा करावा, यासाठी पाठपुरावा केल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, सहाय्यक प्रशासक्रिय अधिकारी विनोद जाधव व पालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाने जयंतीदिनी नामफलक उभा राहिल्याने खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यात आले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.