मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

तेलगी घोटाळ्यानंतर स्टॅम्प विक्रेत्यांसाठी सरकारने प्रथमच घेतला मोठा निर्णय

सातारा : तेलगी स्टॅम्प घोटाळ्यानंतर सरकारने नव्याने मुद्रांक तथा स्टॅम्प विक्रीचे नव्याने परवाने देणे बंद केले होते. मात्र, तत्पूर्वीच्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना अटी व शर्तींवर परवाने हस्तांतर करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

मुद्रांक विक्रेत्यांचा मृत्यू झाला असल्यास, बेपत्ता झाला असल्यास अथवा शारीरिक, मानसिक अक्षमता , वृद्धत्व कारणाने काम करू न शकणाऱ्या वारसांना उपजिविकेसाठी अटी व शर्तींवर परवाने हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक तेलगी स्टॅम्प घोटाळ्यानंतर शासनाने नव्याने परवाने बंद केले होते. बँक, पोस्ट कार्यालय, फ्रँकिंग व ई पेमेंट द्वारे स्टॅम्प ड्युटी ( शुल्क) अदा केले जात आहे. मात्र, किरकोळ व्यवहार आणि नोटरीसाठी स्टॅम्प आज तितकेच आवश्यक असल्याने शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्टॅम्प विक्रेत्यांनी स्वागत व आभार व्यक्त केले आहेत.

दिड हजार पक्षकारांचे साताऱ्याचे हेलपाटे वाचणार; फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर

सातारा : पाच लक्ष रुपयेपेक्षा जास्त किमतीचे दिवाणी दावे चालविण्यासाठी सातारा येथे जावे लागणाऱ्या फलटण तालुक्यातील सुमारे दिड हजार पक्षकार तसेच वकिलांचे हेलपाटे थांबणार आहेत. फलटण येथेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास  मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. 

फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करणे बाबत मागील वीस वर्षापासून प्रस्ताव प्रलंबित होता. फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी याबाबत ११/१२/२०२४, रोजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, यांना फलटण येथील प्रस्तावित वरिष्ठ दिवाणी न्यायालय अंतिम मान्यता मिळणे व पदस्थापना आणि निधीची तरतूद होणे बाबत विनंती केली होती. तसेच याबाबत नुकतेच  12 सप्टेंबर 2025, रोजी फलटण वकील संघ यांनी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली होती. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापनेबाबत, प्रस्तावातील त्रुटी पूर्तता करण्यासाठी फलटणमधील वकील संघाचे शिष्टमंडळ( ॲंड नितीन जाधव,ॲंड सचिन शिंदे ,ॲंड
सागर देशपांडे व इतर ) दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी, मुंबई येथे माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, सचिन पाटीलयांचे सह विधी न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे, विधी न्याय विभाग सचिव श्रीमती किवले मॅडम, तसेच मंत्रालय मुख्य सचिव श्री श्रीकर परदेशी , व इतर यांना समक्ष भेटून प्रस्तावा मधील त्रुटी दूर करून, मुख्यमंत्री कार्यालयातून छाननी करून अर्थ खात्याची मंजुरीसाठी पाठवले होते.

त्यावर आज दिनांक 30/9/2025 रोजी फलटण येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय स्थापन करणे बाबत मंत्रिमंडळ मध्ये मंजुरी देण्यात आली, यासाठी फलटण वकील संघाचे आजी-माजी अध्यक्ष, यांनी योगदान दिले, तसेच माजी खासदार श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार श्री सचिन पाटील यांनी पाठपुरावा केला त्यांचे विशेष आभार फलटण वकील संघ कार्यकारणी व अध्यक्ष  ॲंड नितीन जाधव यांनी व्यक्त केले आहेत.

फलटणमध्ये कॅनॉलचे अस्तरीकरण ...! नेमका लाभ कोणाला ? तालुक्यात विविध चर्चांना उधान

सातारा : बारामतीकरांना माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांच्यानंतर अनेक वर्षाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आव्हान दिले. ज्या नीरा देवघर धरणाच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावरून आव्हान दिले त्या नीरा देवघरच्या पाणी वाटपाला महायुतीच्या मनोमिलनाने स्थगिती मिळाली आहे  मात्र, सध्या फलटण शहरात हजारो खड्डे पडलेले असताना दुसऱ्या बाजूला मात्र शहरातून 
जाणाऱ्या नीरा उजवा कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणाचे काम जोमाने सुरू आहे. नेमके हे काम कोणाच्या भल्यासाठी सुरू आहे ? असा प्रश्न आणि विविध चर्चांना तालुक्यात उधान आले आहे.

नीरा उजवा कॅनॉलच्या अस्तरीकरणाला काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी मोर्चा काढून प्रखर विरोध केला होता. त्यावर उपाय म्हणून शेती क्षेत्र वगळून सध्या अस्तरीकरणाचा पहिला टप्पा बारामती पूल ते पंढरपूरपूल ते रावरामोशी पूल  ( फलटण शहर व कोळकी हद्द) एवढे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या पंढरपूरपुला नजिकचे काम जोमाने सुरू आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, असतरीकरणामुळे कॅनॉललगतचे नागरी क्षेत्र सुरक्षित व्हावे, यासाठी काम हाती घेतले असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अस्तरीकरणामुळे त्या परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीवर काय परिणाम होतो , हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, तो पर्यंत फलटण शहर आणि कोळकी गावच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम दिसून येत आहे.

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता श्रीराम कारखाना अवसायनात काढण्याचा सल्ला : आ. रामराजे ना. निंबाळकर यांचा गौप्यस्फोट

सातारा : एकेकाळी आर्थिक अडचणीत आलेला फलटणचा श्रीराम सहकारी साखर कारखाना अवसायनात काढून पुढे होणाऱ्या लिलावा प्रक्रियेत खरेदी करा, असा सल्ला दिवंगत तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिला होता, असा गौप्यस्फोट विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला

श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, देशमुख यांचा सल्ला न स्वीकारता कारखाना वाचवून आणि सहकारी तत्वावर चालवून अडचणीतून बाहेर निघत आहे. मात्र, आज जे विरोधक कारखान्यावर आरोप करत आहेत ते तेव्हा काँग्रेसमध्ये होते असे माजी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांना टोला लगावला.तसेच कारखान्याच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेतलेले माजी सनदी अधिकारी विश्वास भोसले हे कारखाना अडचणीत असताना नोकरी करत होते, असे थेट टोला व्यासपीठावर उपस्थित भोसले यांना रामराजे ना निंबाळकर यांनी लगावला. तसेच न्यायालयात दाखल केलेली याचिका भोसले यांनी मागे घ्यावी व निवडणुकीला सामोरे यावे, असे आव्हान देखील रामराजे ना निंबाळकर यांनी दिले.

दोन मोठ्या निवडणूका विरोधात ; फलटणमध्ये राजेगटाच्या प्रेरणास्थानी अद्यापही उपमुख्यमंत्री अजित पवार...!

 
सातारा: लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतदेखील महायुतीच्या व परिणामी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या फलटणच्या राजेगटाच्या  प्रेरणास्थानी अद्यापही उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. सोमवारी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे ना. निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.


यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे ना. निंबाळकर यांच्यासह संचालक व सदस्य उपस्थित होते. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुद्रित वार्षिक अहवाल सदस्यांना माहितीसाठी देण्यात आले. अहवालावर विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्फूर्तीस्थान म्हणून स्थान कायम ठेवल्याचे लक्षवेधी होते. कारण 10 महिन्यापूर्वी झालेल्या विधासभा निवडणुकीत अजित पवार यांनी तत्कालिन आमदार दिपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली मात्र राजे गटाने त्यावेळी खा.शरद पवार तथा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्या निवडणुकीत ना. अजित पवार यांनी सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी दिली. मतदारसंघात तीन सभा घेऊन राजे गटावर तिखट शब्दात टीकास्त्र केले. परिणामी राजे गटाचे आ.दिपक चव्हाण यांचा पराभव करून ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन कांबळे पाटील हे निवडून आले. 

हा पराभव राजे गटासाठी मोठा धक्का होता. मात्र, त्यानंतर पुलाखालून राजकीय पाणी गेले. नुकत्याच झालेल्या माळेगांव ( बारामती) सहकारी कारखाना निवडणुकीत राजे गटाने फलटण तालुक्यातील सभासदांचे मतदान ना. अजित पवार यांच्या पॅनलला होण्यासाठी भरघोस मदत केली.त्यानंतर पुन्हा एकदा राजे गट आणि ना. अजित पवार यांची राजकीय जवळीक वाढू लागली असून त्याचेच प्रतिबिंब सोमवारी झालेल्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेच्या मुद्रित वार्षिक अहवालात दिसून आले.

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

तीन तासात ६३ जणांनी केले रक्तदान ; नवरात्रौ उत्सवानिमित्त साताऱ्यातील श्रीमंत बालवीर मंडळाचा उपक्रम

सातारा : श्रीमंत बालवीर नवरात्रौ उत्सव मंडळ, कामाठीपुरा, सातारा यांच्यावतीने सलग १४ व्या वर्षी रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवला असून तब्बल ६३ युवक आणि युवतीनी रक्तदान अवघ्या तीन तासात केले. कायम सामाजिक उपक्रम राबवून युवक आणि युवतीना वैचारिक वसा आणि वारसा जपण्यासाठी प्रेरित केले जाते. वर्ष भरात गरजूना देखील प्रत्यक्ष मदत करणारे मंडळ अशी ओळख परिसरात आहे. महिलांमध्ये पहिल्यांदा युवती कु.पैलवान दिव्या पोळ, प्रिया पाटील तसेच सलग रक्तदान करणाऱ्या श्रीमती जयश्री लोखंडे यांनी पुढाकार घेतला. 


मंडळ आरोग्य शिबीरे, प्रबोधन पर व्याख्याने, वाचन चळवळ सारखे उपक्रम राबवत आहे. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे श्री सचिन लोखंडे, प्रसाद पाटील, आकाश गोरे, महेश लोखंडे, आशिष लोखंडे, निलेश रसाळ, उमाकांत साळूंखे, बाळासाहेब बनकर, विकास गोरे, सागर कुदळे, युवराज काळोखे,हणमंत लोखंडे, मनोज लोखंडे, किरण घाडगे, साहिल शिंदे, गणेश गोरे, अनिकेत रावळ यांनी परिश्रम घेतले.

अनाथ, बेघर, निराधार व्यक्तीच्या मदतीसाठी छोटा हात लावा : यशोधन ट्रस्टचे विनंतीपूर्वक आवाहन

सातारा : गेली अनेक वर्षापासून अनाथ, बेघर, निराधार, वयोवृद्ध नागरिकांचे पालन, पोषण, सर्वांगाने सांभाळ करणाऱ्या वेळे, सातारा येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्टने मदतीचे आवाहन केले आहे 

यशोधन आश्रमात एकूण 110 लोक राहत आहेत. त्यामध्ये 50 अनाथ, निराधार, बेघर, वयोवृद्ध महिला राहत आहेत.सध्या प्रचंड पाऊस व थंडी पडली आहे. महिलांना  अंघोळीसाठी गरम पाण्याची गरज आहे. त्यासाठी गरम पाण्याच्या बंबाची गरज आहे. साधारण 100 लिटर गरम पाण्याचा बंब 19000/- रु किंमत आहे. विनंती आहे जेवढी शक्य आहे तेवढी गरम पाण्याच्या बंबासाठी मदत करावी, असे विनंतीपूर्वक आवाहन करण्यात आले असून एक छोटासा मदतीचा हात आपल्या निराधार महिलांच्यासाठी मिळावा. मदतीसाठी बँक डिटेल्स 

Yashodhan charitabal trust 
HDFC BANK 
Ac. NO = 50200065035251
IFCS CODE = HDFC0002206 
BRANCH  = WAI (CURRENT)

ONLINE GPAY  

9922424236 

यशोधन अनाथ आश्रम, वेळे सातारा 
9922424236

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

प्रधानमंत्री यशस्वी योजनेअंतर्गत ह्या प्रवर्गातील ९ ते १२ वी विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य ; अर्ज करण्याचे आवाहन

सातारा :  इयत्ता. 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व विमक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून टॉप क्लास एज्युकेशन इन स्कुल फॉर इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व विमक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्टुडंट अंडर प्रधानमंत्री यशस्वी या योजनेअंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी 9 वी ते 10 वी साठी रु.75 हजार व इ. 11 वी ते 12 वी साठी रु. 1 लाख 25 हजार  इतकी वार्षिक आर्थिक सहाय्य शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा फी व गणवेश इ. साठी देण्यात येणार आहे  सदर योनेसाठी विद्यार्थ्यांची निवड हि गुणवत्तेच्या आधारे केली जाणार असून आर्थिक सहाय्य डीबीटी व्दारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे.


सदर योजनेचा लाभ सातारा जिल्ह्यामधील निवडक शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून सदर शाळांची यादी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सातारा यांचेकडे सुपुर्द करण्यात आलेली आहे. तसेच सदर यादीमध्ये नमूद शाळेतील मुख्याध्यापकांना, प्राचार्य यांनी आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी या वर्गात शिकणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न एकूण 2.5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्याथ्यांचे अर्ज सदर योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता https://scholarships.gov.in या पोर्टलवर दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरुन घ्यावेत असे अवाहन डॉ. कांचन जगताप, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांनी केले आहे.

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

सुजात आंबेडकर यांचा शनिवारी साताऱ्यात संवाद मेळावा

सातारा : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात(दादा)आंबेडकर शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सौभाग्य मंगल कार्यालय येथे स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर निवडणूक संदर्भाने साताऱ्यात संवाद मेळाव्यासाठी येणार आहेत.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. क्रांतीताई सावंत तसेच राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मेळाव्यास सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी , भारतीय बौद्ध महासभा , समता सैनिक दल तसेच आंबेडकरी विचारधारावर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच पदवीधर मतदार बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येनं मेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा महासचिव गणेश भिसे यांनी केले आहे.

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाचा सायरन वाजला...! पुढे आवाज येत होता... भिऊ नकोस मी पाठीशी...!



सातारा (सम्राट गायकवाड) : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात वेगवेगळ्या शासकीय विभागाने नागरिकांना योजनांची माहिती व अंमलबजावणी यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर सेवा पंधरवडा संपन्न होत आहे. अशाच मात्र अनोख्या सेवेचे दर्शन फलटणच्या नागरिकांना फलटणच्या प्रांताधिकारी यांच्याकडून झाल्याचे गुरुवारी सकाळी दिसून आले.

फलटणच्या गिरवी नाका परिसरात प्रांताधिकारी यांचे निवासस्थान आहे. अन् शेजारीच काही मीटर अंतरावर श्री.स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर आहे. त्यामुळे स्वाभाविक मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती. तसेच अनेक वाहने परिसरात लावण्यात आलेली होती. अशी स्थिती गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास असताना प्रांताधिकारी यांचे शासकीय वाहन निवासस्थानमधून बाहेर निघाले मात्र, बाहेर निघताच त्यांचे वाहनासमोर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची दोन चार चाकी वाहने लागली होती. त्यामुळे प्रांताधिकारी यांच्या वाहनचालकाने थेट वाहनाचा सायरन वाजविण्यास सुरुवात केली. त्यामूळे साहजिकच परिसरातील नागरिक आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष गेले. अन् त्या गर्दीतून दोन जण पळत आले अन् आपली वाहने बाजूला करून प्रांताधिकारी यांच्या वाहनाला रस्ता मोकळा करून दिला.

परंतु सायरन वाजल्याने प्रांताधिकारी यांना तत्काळ कामाच्या ठिकाणी पोहचायचे असेल, असा समज नागरिकांचा झाला. मात्र, जिथून रस्ता मोकळा करून दिला तिथून काही पावलांवर असलेल्या श्री. स्वामी समर्थ यांचे मंदिर येथे रांगेत उभा न राहता. थेट प्रांताधिकारी यांनी श्री.स्वामी समर्थ मंदिरात जावून यांचे दर्शन घेतले अन् त्यानंतर (wrong side) उजव्या बाजूला लावलेले वाहन प्रांताधिकारी वाहनात बसल्यानंतर पुढे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात आयोजित फलटण येथील सेवा पंधरवडा पंधरवडा कार्यक्रमासाठी रवाना झाले.

रयत क्रांतीचे प्रकाश साबळे यांच्या मागणीला सत्तेतील शिवसेना व राष्ट्रवादीची साथ...! शेतकऱ्यांसाठी खासदार, मंत्री, आमदार देणार एक महिन्याचे वेतन


सातारा : मराठवाड्यासह सातारा जिल्ह्यात देखील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यासाठी थोडा हातभार म्हणून गेली अनेक वर्ष पेन्शन आणि वेतन घेत असलेल्या राज्यातील आमदार व खासदारांची कोट्यवधी रुपयांची सहा महिन्याची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा युवा आघाडी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे. साबळे यांच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील साथ देत मदत जाहीर केली आहे.



ना. एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.  मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेनं मोठा मदतीचा हात दिला आहे. राज्यात आलेल्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व मंत्री तसेच आमदारांचे एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे.  नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही, असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तर,उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या आदेशानुसार  सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वीच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपला 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच सर्व आमदार, खासदारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना प्रमुख यांनी जाहीर केलेल्या मदतीचे रयत क्रांतीचे प्रकाश उर्फ सोनू साबळे आभार व्यक्त केलेत.

दरम्यान, सरकारने जाहीर केलेली मदतीतून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कदापि भरून येणारे नाही. त्यासाठी थोडा हातभार म्हणून गेली अनेक वर्ष पेन्शन आणि वेतन घेत असलेल्या राज्यातील आमदार व खासदारांची कोट्यवधी रुपयांची सहा महिन्याची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा युवा आघाडी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी बुधवारी सकाळी केले होते. त्यानंतर राज्यभरातून राजकीय नेत्यांनी मदतीची भूमिका घेण्यास सुरुवात केली.

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे देखील मदतीसाठी पुढाकार घेणार असून राज्यातील विद्यमान विधानपरिषदेतील २८८ व विधानपरिषदेतील ८५ आमदार तसेच राज्यातील ४८ खासदार यांनी आपले सहा महिन्याचे वेतन अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला द्यावे. त्याचप्रमाणे गेली वर्षोंनु वर्ष पेन्शन घेत असलेल्या माजी खासदार व आमदार यांनी आता शेतकऱ्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असून त्यांनी देखील सहा महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावी, असे आवाहन साबळे यांनी केले. तसेच सातारा जिल्ह्यातील उद्योगपती यांनी देखील CSR तरतुदीनुसार त्याच प्रमाणे शासकीय अधिकारी वर्गाने देखील आपले एका महिन्याचे वेतन व तीन महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावी, असे देखील आवाहन साबळे यांनी केले आहे.

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी आजी, माजी आमदार व खासदारांची पेन्शन व वेतन रक्कम द्या ; रयत क्रांतीचे प्रकाश उर्फ सोनू साबळे यांची मागणी


सातारा: मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी व सातारा जिल्ह्यात देखील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेली मदतीतून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कदापी भरून येणारे नाही. त्यासाठी थोडा हातभार म्हणून गेली अनेक वर्ष पेन्शन आणि वेतन घेत असलेल्या राज्यातील आमदार व खासदारांची कोट्यवधी रुपयांची सहा महिन्याची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा युवा आघाडी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे.

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे देखील मदतीसाठी पुढाकार घेणार असून राज्यातील विद्यमान विधानपरिषदेतील २८८ व विधानपरिषदेतील ८५ आमदार तसेच राज्यातील ४८ खासदार यांनी आपले सहा महिन्याचे वेतन अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला द्यावे. त्याचप्रमाणे गेली वर्षोंनु वर्ष पेन्शन घेत असलेल्या माजी खासदार व आमदार यांनी आता शेतकऱ्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असून त्यांनी देखील सहा महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावी, असे आवाहन साबळे यांनी केले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील उद्योगपती यांनी देखील CSR तरतुदीनुसार त्याच प्रमाणे शासकीय अधिकारी वर्गाने देखील आपले एका महिन्याचे वेतन व तीन महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावी, असे देखील आवाहन साबळे यांनी केले आहे.

११ वर्षांनी आ. सदाभाऊ खोत फलटणला आले ; एवढ्या शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाला प्रतिसाद

सातारा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्याचे नेते, मंत्री आणि दोन वेळा आमदार झालेले ( पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी शेतकरी संघटना ) रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ.सदाभाऊ खोत तब्बल ११ वर्षानंतर फलटण  तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज ( मंगळवारी) झालेल्या आंदोलनाला आले. विशेषतः गोवंश हत्या बंदी कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी सत्तेत असलेले आ.सदाभाऊ खोत हे  विधानपरिषदेत प्रश्न मांडण्याऐवजी  रस्त्यावर आंदोलन करत असल्याने आणि लोकसभा निवडणुकीनंतर ११ वर्ष मतदारांना तोंड दाखवल्याने बहुदा  फलटण तालुक्यातील अत्य अल्प शेतकऱ्यांनी आंदोलनाला उपस्थिती दर्शविली. तर उलट आंदोलनात जनावरे व्यापाऱ्यांची संख्या मात्र, लक्षणिय होती.


दरम्यान, आंदोलनांनंतर अजिंक्य सहयाद्री न्युज प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर आ.खोत म्हणाले, गोवंश हत्या कायदा बंदी दिवंगत नेते शरद जोशी हयात असताना आला. त्यावेळी त्यांनी त्या कायद्याला विरोध केला होता. मी देखील पुढे हा कायदा सभागृहात होत असताना निवेदन केले आहे आणि ह्या कायद्याचा कॅन्सर उशिरा लक्षात आल्याने अनेक शेतकरी आमच्याकडे येवू लागले म्हणूनच आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आहे आणि येत्या अधिवेशनात ह्या कायद्याबाबत सभागृहात आवाज उठवणार असल्याचे खोत यांनी सांगितले. तसेच २०१४ च्या माढा लोकसभा निवडणूकीत  फलटनमधुन मिळालेल्या मतांच्या प्रेमानंतर देखील ११ वर्ष न फिरकल्याने आंदोलनाला अत्य अल्प शेतकऱ्यांनी आंदोलनाला उपस्थिती दर्शविली आहे का ? असे विचारताच ते म्हणाले, माझे फलटणवरील कायम असून कधी ही आटणार  नाही, असे सांगून मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न आ.खोत यांनी केला.

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

फलटण नगरपालिकेच्या इमारतीतच पाणी गळती ; बांधकामाची दुरुस्ती होईल पण ऑडिट करण्याचे धाडस नूतन मुख्याधिकारी दाखवतील ?


सातारा ( सम्राट गायकवाड ) : राज्यांत चर्चेत असलेली ऐतिहासिक फलटण नगर पालिका आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शहराला पाणी पुरवठा तसेच पाणी गळती काढण्याची आणि सार्वजनिक विकास बांधकामे करणाऱ्या फलटण नगर पालिकेच्या नूतन इमारतीला किरकोळ पावसातच  पाणी गळतीचे ग्रहण लागले आहे. काही वर्षातच स्लॅब असलेल्या इमारतीला गळती लागल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच होणाऱ्या गळतीमुळे अधिकारी, कर्मचारी आणि कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ज्येष्ठ आणि दिग्गज दिवंगत नेते यांच्या नावाने फलटण शहरासाठी नूतन इमारत ९ वर्षापूर्वी उभारण्यात आली. पालिकेच्या सभागृहाला देखील ज्येष्ठ नेत्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्या इमारतीची गरिमा, प्रतिष्ठा आणि बांधकामाचा दर्जा देखील राखण्याची जबाबदारी पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांची आणि आता प्रशासक यांची आहे. नूतन इमारत उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाचे व परिणामी नागरिकांच्या कर रूपाचे खर्च करण्यात आले. मात्र, काही वर्षातच ह्या नूतन इमारतीला पाणी गळतीचे ग्रहण लागले आहे. विशेष बाब म्हणजे पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पालिकेच्या तिजोरीत भर घालणाऱ्या वसुली विभागातच गळती सुरु झालीय. त्यामुळे अक्षरशः पाणी वाहू नये म्हणून त्या ठिकाणी बादली ठेवावी लागली आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या खाली देखील मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याचे दिसून आले.

एकूणच पाणी गळतीने इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेच त्याच बरोबर भविष्य काळात इमारतीला होणारा मोठा धोका ओळखून आणि दुर्घटना टाळण्यासाठी बांधकामाचे ऑडिट होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पालिकेने फलटण शहरात उद्याने, मैदाने कमी आणि शॉपिंग सेंटर अधिक बांधली आहेत. त्या देखील शॉपिंग सेंटरमध्ये पाणी गळतीचे प्रमाण वाढले असून नूतन मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव हे सर्व बांधकामाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याचे धाडस करतील का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

क्रमशः 

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

सोलापूरची प्रतिक्षा संपली; साताऱ्याचे काय ? खासदारांसह पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जबाबदारी वाढली...!

सातारा ( सम्राट गायकवाड ) : जैसे बोले...तैसा चाले...! ब्रीद वाक्यानुसार मंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून सोलापूर ते मुंबई देखील विमानसेवा सुरू करत असल्याचे आज जाहीर केले. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि सोलापूरचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे यांनी यांनी सातत्याने पाठपुरावा करून किमया केली आहे. दरम्यान, ना. गोरे यांच्या किमयेने माञ, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व खासदार उदयनराजे भोसले व इतर लोकप्रतिनिधी यांच्याकडून साहजिकच जनतेच्या अपेक्षा वाढणार आहेत. सोलापूरचे विमानतळ सुरू होवू शकते तर ऐतिहासिक राजधानी सातारा येथे केव्हा सुरू होणार, असा प्रश्न साहजिकच आता पुढे येणार आहे.

ना. जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हातात घेताच अल्पावधीतच अनेक वर्ष रेंगाळलेला सोलापूर विमानसेवेचा प्रश्न मार्गी लावला. काही महिन्यांपूर्वी नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सुरुवातीला सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली. त्या कार्यक्रमातच ना.जयकुमार गोरे यांनी सोलापूर ते मुंबई मार्गाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचा शब्द ना.मुरलीधर मोहोळ यांच्याकडून वदवून घेतला होता अन् त्यानंतर दोन महिन्यातच आता सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते बँगलोर विमानसेवा सुरू होणार आहे.

दरम्यान, सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्याने साहजिकच साताऱ्याचे काय ? असा प्रश्न उपस्थित होणार आहे. कराड येथील विमानतळाचा प्रश्न रेंगाळलेला आहे तर साताऱ्यात विमानतळ हे स्वप्न देखील अद्याप कोणी पाहिलेले नाही. मात्र, शेजारील सोलापूरमध्ये होवू शकते तर ऐतिहासिक राजधानी साताऱ्यात का नाही ? असा प्रश्न आता उपस्थित होणार आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे अन् येथील खासदार उदयनराजे भोसले यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तर जिल्ह्यातील चार आमदार राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटपदी आहेत. तसेच पर्यटन खाते असलेले ना.शंभूराज देसाई यांच्यावर सातारा जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी आहे. एवढी मोठी राजकीय ताकद असल्याने सातारा जिल्ह्यात विमानतळ सहज मंजूर करून घेणे शक्य आहे. फक्त अभाव आहे तो इच्छाशक्तीचा. जी इच्छाशक्ती ना. जयकुमार गोरे यांनी सोलापुरसाठी दाखवली तशीच इच्छाशक्ती सातारा जिल्ह्यातील खासदार व मंत्र्यांनी तसेच उर्वरित आमदारांनी देखील दाखविणे आवश्यक आहे, अशी इच्छा युवा वर्ग व्यक्त करू लागला आहे. 

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

बालकांना शिक्षण की वाहनतळ महत्त्वाचे? फलटणच्या राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता !

सातारा :  शिक्षणाचे महत्व महापुरुषांनी कार्यातून व लेखनातून मांडले आहे.. परिणामी शिक्षणाच्या जोरावरच  देशात व विदेशात भारतीय विद्यार्थ्यांचा डंका वाजत आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील फलटण येथील गोरगरीब व सर्वसामान्य घरातील बाल विद्यार्थ्यांना शिक्षणाचे पहिले पाऊल टाकतानाच आज अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फलटण येथील महात्मा फुले चौका नजिक असलेल्या नगर पालिकेच्या प्राथमिक शाळेच्या वर्गातच अंगणवाडीच्या बाल विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. परिणामी अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागत असल्याने शिक्षकांची कसरत होत आहे. तर उलट शाळेच्या समोरच उपलब्ध असलेली एक एकरपेक्षा अधिक जागा ( एके काळी खुले मैदान असलेली जागा ) व्यावसायिक वाहनतळ यासाठी देण्याचा महापराक्रम करण्यात आला आहे. 

सद्यस्थितीत त्या शाळेचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, नूतनीकरण करत असताना प्रशासन आणि राज्यकर्त्यांना अंगणवाडी शाळेचा विसर पडला. विशेष बाब म्हणजे नगर पालिका शिक्षण मंडळाचे कार्यालय देखील त्याच ठिकाणी आहे. शिक्षणाचा मूलभूत अधिकार असला तरी खासगी शिक्षणसंस्थेत प्रवेश घेणे परवडणारे नाही. खासगी अंगणवाडीची ( नर्सरी ते सिनियर के. जी.) सरासरी वार्षिक फी 20 हजार रुपये इथपर्यंत आहे. त्यामुळे साहजिकच सरकारी शाळेत व अंगणवाडीतदेखील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी प्रशासनाने देखील दखल घेवून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
मात्र, नेमका उलटा प्रकार फलटणमध्ये सुरू आहे. अगोदरच छत्रपती शिवाजी महाराजनगर येथील पालिकेच्या शाळेचे तीन वर्ग खासगी शिक्षणसंस्थेला भाड्याने दिले आहेत. तर आता दुसऱ्या ठिकाणी अंगणवाडीला वर्गच उपलब्ध नाही अन् समोरील एक एकर जागा वाहनतळ साठी देण्याचा पराक्रम करण्यात आला आहे. तेव्हा किमान त्या अंगणवाडीला आणि त्या ठिकाणी शिक्षणाचे पहिले पाऊल टाकणाऱ्या विद्यार्थ्यांची कुचंबणा थांबविण्यासाठी अंगणवाडीचे नवीन वर्ग बांधण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शाळेच्या आवारात पुरेशी आणि प्रसंगी वाहनतळ येथे प्रचंड मोकळी जागा उपलब्ध आहे. तेथे राज्यकर्ते आणि प्रशासनाने ठरवले तर तत्काळ निर्णय घेवून अंगणवाडी इमारत उभारण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.


क्रमशः

फैसला मिनी मंत्रालयाचा..! बारामतीच्या चुलीवर फलटण तालुक्यात राजकीय मिसळ ; येत्या निवडणूकीत नेत्यांची होणार K.Y.C...!


सातारा ( सम्राट गायकवाड) : देशात व राज्यात सत्तेसाठी सुरु झालेली राजकीय मिसळ आता तालुकास्तरावर देखील सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः ग्रामीण विकासकामांची नाडी असलेल्या मिनी मंत्रालय तथा जिल्हा परिषदेवर सत्ता काबिज करण्यासाठी ' झाले गेले विसरून '  सर्व बाजूने तडजोडीना वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील फलटण येथील राजे गट महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला. माञ, वर्षभरात आणि विशेषतः माळेगांव कारखान्याच्या निवडणूक निमित्ताने घडलेल्या अनेक घडामोडीनंतर राजे गट आता ना. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत स्पष्टपणे जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कदचित हा निर्णय झाला तर त्याचा मोठा परिणाम फलटणसह जिल्ह्याच्या राजकारणावर आणि आगामी स्था. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होवू शकतो.

गेली २५ वर्ष सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले व सध्या ( सत्तेतून दूर असल्याने )  डिफेन्स मोडवर असलेले फलटणचे विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर व कुटुंबीय ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याचा स्पष्ट निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची सध्या चर्चा आहे. मात्र, त्यामुळे स्वाभाविकच फलटणसह विशेषतः माण, सातारा आणि वाईचे नेतृत्वदेखील अलर्ट होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला फलटणमध्ये राजे गटाने स्वाभाविकपणे ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय कदाचित घेतलाच तर अगोदरच झालेल्या तालुक्याच्या राजकीय मिसळीत आणखी भर पडणार आहे. कारण, भाजपकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले फलटण विधानसभा मतदारसंघ ऐनवेळी ना.अजित पवार यांना सोडण्यात आल्याने भाजपचे सचिन कांबळे पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. ना. अजित पवार यांनी केलेल्या सभा व फलटण व कोरेगाव तालुक्यातील अजित पवार गटाचे नेते यांनी झोकून प्रचार केल्याने सचिन कांबळे पाटील यांचा विजय सहज शक्य झाला आणि राजे गटाच्या 30 वर्षाच्या अबाधित सत्तेला सुरुंग लागला. परिणामी फलटण तालुक्यातील राजे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप तर काहींनी ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले. दिवसेंदिवस राजे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात होत असताना आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निमीत्ताने ट्विस्ट निर्माण झाला आहे. 

काँग्रेस आणि नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सातारा जिल्हापरिषदेवर सत्ता राहिली आहे. माञ, आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले आहे. जिल्ह्यात आठ पैकी 4 विधानसभा मतदार संघ भाजपकडे तर प्रत्येकी दोन मतदासंघ संघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी व ना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. उदयनराजे भोसले हे भाजपकडून लोकसभा तर नितीन पाटील हे राष्ट्रवादीकडून राज्यसभा खासदार आहेत. तर भाजपने दोन तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. अशा स्थितीत साहजिकच भाजपचे सातारा जिल्ह्यात प्राबल्य वाढत आहे तर तुलनेत जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवलेली राष्ट्रवादी मागे आहे. अशावेळी ना.अजित पवार यांनी माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर  यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांचा कराड दक्षिण मधून प्रवेश घेतला तर माण - खटावमधून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा देखील प्रवेश झाला. मात्र, एवढ्या सैन्यावर सातारा जिल्हा परिषदेवर सत्ता आणणे है ना.अजित पवार यांना भाजपच्या आव्हानासमोर कठीण असणार आहे. नेमके अशावेळी ३५ वर्ष राजकारणाचा अनुभव आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रभाव, संपर्क असलेले ज्येष्ठ नेतृत्व आ.रामराजे नाईक निंबाळकर व कुटुंबीय स्पष्टपणे ना.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्यास मोठा परिणाम निवडणुकांच्या निकालावर होवू शकतो. माञ, हा निर्णय घेताना साहजिकच ना.अजित पवार यांना स्थानिक आमदार व फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजे गटाच्या विरोधात भूमिका घेतलेल्या दिग्गज नेत्यांना विचारात घ्यावे लागणार हे स्वाभाविक असून त्यावरच पुढील निर्णय होवू शकतो.

क्रमशः

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

हॅलो..माईक टेस्टिंग... मंडपवाले आवाज वाढवा ! ११ वर्षाने सदाभाऊ खोत यांचे होणार फलटणरांना दर्शन आणि मार्गदर्शन. .!

सातारा ( सम्राट गायकवाड) : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्याचे नेते, मंत्री आणि दोन वेळा आमदार झालेले ( पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी शेतकरी संघटना ) रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ.सदाभाऊ खोत तब्बल ११ वर्षानंतर फलटण  तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी येणार आहेत. राज्यात सत्ता असलेल्या महायुती सरकारमध्येच आमदार असलेले आ.सदाभाऊ खोत सरकारच्याच धोरणांच्या विरोधात राज्यात ठीकठिकाणी मोर्चे करत असताना आता त्यांना तब्बल ११ वर्षानंतर माढा लोकसभा मतदार संघातील फलटण तालुक्याची सक्रिय आठवण झाली आहे. त्यामुळे साहजिकच २०१४ च्या माढा लोकसभा निवडणूकीत सदाभाऊ खोत यांना मतदान केलेल्या मतदारांसाठी एक प्रकारे खोत यांचे दर्शन घेण्याची तसेच मार्गदर्शन देखील ऐकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

राज्य सरकारने केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यात बदल करण्यात यावा. गाईच्या दुधाला 40 रुपये प्रति लिटर, उसाला प्रति टन 4 हजार रुपये दर मिळावा, शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी देखील मिळावी, ह्या मागण्यांसाठी २३ सप्टेंबररोजी विधानसभेवर नव्हे तर फलटण तहसिल कार्यालयावर आ.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसह जनावरे व्यावसायिक यांच्या भल्यासाठी मोर्चा निघतोय हे उत्तमच परंतु त्या निमित्ताने सदाभाऊ खोत यांना तब्बल ११ वर्षाने फलटणची आठवण होणे हे देखील सुवर्ण अक्षरात लिहण्यासारखा योग म्हणावा लागेल.
कारण, सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार प्रतिनिधित्व करत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात मोदी लाटेत भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना ( पक्ष) यांच्याकडून थेट सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली. अटीतटीच्या झालेल्या लढतीत खोत यांचा निसटता पराभव झाला. मात्र, त्या निवडणूकीत फलटण - कोरेगाव विधानसभा मतदासंघातील मतदारांनी खोत यांच्या पारड्यात भरघोस मते टाकली. परंतु त्यानंतर खोत राज्यात मंत्री आणि दोन वेळा विधान परिषदेचे आमदार देखील झाले. एवढेच काय, सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून देखील संधी देण्यात आली. माञ, फलटण तालुक्याकडे खोत यांनी ११ वर्षात ढुंकूनही पाहिले नाही. तेच आणि सत्तेत असलेले आमदार सदाभाऊ खोत ११ वर्षानंतर पुन्हा फलटणला येत आहेत. तेव्हा ' आमानी आणि तुमानी'  हे नीट ऐकण्यासाठी साऊंड सिस्टीम चांगली असावी, अशी अपेक्षा खोत यांचे फलटण येथील रसिक श्रोते व  पूर्वाश्रमीचे मतदार व्यक्त करताना दिसून येत आहेत.





 

 

बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५

अजितदादांचा निवडणूकीत वादा ; फलटणमध्ये मात्र, विकास सेवा सह. सोसायटीच्या जागेवर आणलीय गदा..!

सातारा ( सम्राट गायकवाड) : विधानसभा निवडणूकीत 'अजित दादांचा वादा ' टॅग लाईनवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फलटणसह संपूर्ण राज्यात ब्रॅण्डिंग करत प्रचार केला. त्यावर फलटणच्या मतदारांनी आमदार देखील निवडून दिले. मात्र, आता एक वर्षाच्या आतच वेगळा अनुभव फलटणच्या मतदारांना येण्यास सुरुवात झालीय. त्यापैकीच धक्कादायक प्रकार ना. अजित पवार यांच्या बारामती लगतच असलेल्या आसू गावाच्या वि.का.स.सेवा सोसायटीच्या बाबतीत घडताना दिसून आला. १०० वर्ष पूर्ण केलेली आणि नफ्यात व पुरेसे भाग भागभांडवल शिल्लक असताना देखील सोसायटीची १७ गुंठे जागा विकण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यास काही संचालक आणि सभासदांनी तीव्र विरोध केला आहे.

सहाय्यक निबंधक, फलटण यांना लेखी निवेदन देवून जागा विकण्यास विरोध दर्शविला असून प्रसंगी सोसायटीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. ह्या पूर्वीच जिल्हा बँकेला सोसायटीने आपली काही जागा दिलेली आहे. आता उर्वरित जागेत सोसायटीने सभासदांसाठी मंगल कार्यालय तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारावे. अशी मागणी करून संस्था नफ्यात असताना देखील जागा विकण्याचा घाट नेमका कोणासाठी घातला जातोय ? असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात आणि बारामती नाजिकच व विशेष बाब म्हणजे राज्याचे सहकार खाते देखील ना.अजित पवार यांच्या पक्षाकडे आहे. त्यामुळे साहजिकच ना.अजितदादा आपला वादा कशाप्रकारे पूर्ण करतात, हे पाहणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असल्याने महत्वाचे ठरणार आहे.

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

फलटण पालिका मुख्याधिकारी बदलीमध्ये ट्विस्ट ; राजकीय की विनंती बदली ?

सातारा : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या फलटण नगर पालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे व माजी नगरसेवक अनुप शहा शहा यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. निखिल मोरे यांची  अवघ्या वर्ष भरातच फलटण येथून पुणे येथे बदली झाली आहे.त्यांच्या बदलीनंतर अनुप शहा यांनी आनंद व्यक्त करत आणि माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व आ.सचिन पाटील यांचे आभार व्यक्त करत  आपल्या पाठपुराव्यानेच निखिल मोरे यांची बदली झाल्याचा अप्रत्यक्ष दावा केला आहे.तर दुसऱ्या बाजूला निखिल मोरे हे स्वतः हुन मागील अनेक महिन्यापासून शासनाकडे बदलीसाठी विनंती करत होते.त्यामुळेच त्यांना गडचिरोली नव्हे तर पुणे सारख्या मोठ्या शहरात बदली मिळाली आहे, असे पालिकेतील सूत्रांनी ' अजिंक्य सह्याद्री न्युज'  प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

फलटणसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. परिणामी स्था.स्वराज्य संस्थांच्या कामकाजावर  ( खासदार, आमदार वगळता ) स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा कोणताही अंकुश राहिलेला नव्हता व  पुढील काही महिने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार नाही. त्यामुळे साहजिकच अधिकारी व माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सूचना करून देखील कामे होण्यास विलंब होत आहे. त्यातूनच आक्रमक असलेले माजी नगरसेवक अनुप शहा व मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. दोघांमधील वाद टोकाला जात असताना मात्र माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा यशस्वी पूर्ण केल्याबद्दल मुख्याधिकारी निखिल मोरे व कर्मचाऱ्यांचा पालिकेत येवून अनुप शहा यांच्या उपस्थितीत सत्कार केला.


त्यानंतर तरी शहा व मोरे यांच्यातील वाद संपुष्टात येईल, अशी अपेक्षा कोंडी झालेले पालिकेतील कर्मचारी खासगीत व्यक्त करत होते. मात्र, मोरे यांची तूर्त बदली झाल्याने मोरे व शहा यांच्यातील वादाला स्थगिती मिळाली आहे. परंतु नूतन मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यापुढे अनेक आव्हाने असणार आहेत. त्यामध्ये फलटण शहराच्या मूलभूत समस्या व विकासात्मक आणि आगळ्या वेगळ्या राजकीय संघर्षाचा सामना करावा लागणार आहे, ही बाब जाताना निखिल मोरे हे निखिल जाधव यांना निश्चित सांगून जातीलच

फलटणमध्ये दोन आमदार, मा. खासदार निवासस्थान मार्ग झाला धोकादायक ; अखेर नागरिकच सरसावले

सातारा : फलटण शहरातील नागरिकांना लाखो रुपये पालिकेचा कर भरून देखील पायाभूत सुविधा मिळत नसल्याची मोठी परंपरा आहे. मात्र, आता फलटण शहराचा राजपथ असलेल्या दुहेरी रिंगरोडची अक्षरशः चाळण झाली आहे.  विशेष बाब म्हणजे हा मार्ग फलटणच्या  राज्यकर्त्यांच्या निवास्थानाकडे जातो व येतो. मार्गावर अनेक खड्ड्यांपैकी एक भला मोठा व खोल खड्डा अहिल्यादेवी होळकर चौक ( पृथ्वी चौक) येथे निर्माण झाला. नेमकी अपघाताची होण्याची शक्यता ओळखून परिसरातील नागरिक पुढे सरसावले आणि त्या खड्ड्याच्या बाजूला नारळाच्या झाडाचे बॅरीगेट उभारून होणारे अपघात टाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

विधानपरिषदेचे माजी सभापती आ.रामराजे ना. निंबाळकर, आ.सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष विजयराव बोरावके यांच्यासह दिग्गज राजकीय नेते व उद्योगपती यांच्या निवासस्थानाकडे हा मार्ग जातो व येतो. तसेच संबंधित खड्ड्यापसून काही मीटर अंतरावर विद्यमान आमदार सचिन पाटील यांचे संपर्क कार्यालय आहे. हे अधोरेखित करणे आवश्यक आहे. उर्वरित फलटण शहरातील एक ही रस्ता सामान्य नागरिकांना चालण्यासाठी देखील सुस्थितीत नाही.ही बाब अलहिदा. पण किमान फलटणच्या दिग्गज नेत्यांसाठी तरी खड्डेमुक्त राजमार्ग तथा रिंगरोड दुरुस्त करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करित आहेत.

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

फलटणमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना रेड कार्पेट ; नागरिक माञ घाणीच्या साम्राज्यात


फलटण : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या फलटण शहरात आणि तालुक्यात कोठे, कधी आणि काय घडेल ? ह्याचा नियम नाही. येथे रोज नवनवीन घटना घडत असतात मात्र, अनेक कारणांनी समोर येत नाहीत. त्यापैकीच एक मात्र, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय इमारत परिसरात सध्या घडताना दिसून येते. येथे ग्रामीण भागातून रोज हजारो नागरिक आपल्या प्रशासकीय कामासाठी येत असतात. त्यांना सुलभ व स्वच्छ शौचालय व्यवस्था नाही. जी उपलब्ध आहे तेथे नागरिक सोडा अधिकारी देखील जावू शकत नाहीत. अशा परिस्थितीत दुसऱ्या बाजूला मात्र अधिकाऱ्यांना किंचितही त्रास होवू नये, यासाठी चक्क प्रशासकीय इमारतीच्या सर्व बाजूने सिमेंट कार्पेट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

तूर्त प्रशासकीय इमारतीच्या प्रांत कार्यालय, जि.प.बांधकाम विभाग, निरा देवघर प्रकल्प कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय असलेल्या परिसरात सिमेंट कार्पेट  काम सुरू असल्याचे शनिवारी दिसून आले. अधिकाऱ्यांनी तथा लोक सेवकांनी हे काम करून घेण्यास कोणाचीही हरकत असता कामा नये. कारण एवढे मोठे काम हाती घेतलेच आहे तर साहजिकच तेथे येणाऱ्या नागरिकांना ( कर दाते / Tax payer) यांच्यासाठी आणि विशेषतः महिलांसाठी देखील सुलभ व स्वच्छ शौचालय उभारण्यासाठी प्रयत्न नक्कीच होतील, अशी अपेक्षा नूतन महिला प्रांताधिकारी यांच्याकडे नैतिक अधिकाराने व्यक्त केल्या जात आहेत.

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

खासदार धैर्यशील मोहिते -पाटील यांच्याकडून फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघ दुर्लक्षित ; झाला हा निर्णय...!

सातारा (सम्राट गायकवाड)  :  देशाचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( श.प) धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय प्राप्त केला. मात्र, लोकसभेची एक वर्ष पूर्ण होवून अद्याप कोणतेही ठोस विकासकामे मंजूर करून आणण्यात त्यांना यश मिळालेले दिसत नाही. परंतु त्यांनी संचार मंत्रालयाकडे मागणी केलेल्या पत्रावर नुकताच एक सकारात्मक निर्णय घेण्यात आलाय. परंतु त्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांचा फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक डावलण्यात आला आहे? परिणामी दुर्लक्षित ठेवल्याचे दिसून येते. 

सव्वा वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी तत्कालिन भाजपचे खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांचा पराभव केला. मात्र, निवडणूक निकालात फलटणचे असलेले खा.  रणजितसिंह ना. निंबाळकर यांना फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातून यांना १८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तसेच पुढील झालेल्या विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून खा.रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढला. लोकसभा निवडणुकीत खा. धैर्यशील मोहिते पाटील यांना सहकार्य केलेले आणि फलटण विधानसभा मतदारसंघावर सलग ३० वर्ष  राजे गटाची तथा शरद पवार यांचा वरदहस्त असलेली एक हाती सत्ता विधानसभा निवडणुकीत उलथवून टाकली. मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी भाजप व ना.एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी (अ. प) नेत्यांच्या सहकार्याने महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांना निवडून आणले.  


नेमके ह्या दोन्ही कारणांमुळे की काय ? विद्यमान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून फलटण - कोरेगांव विधानसभा जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवला जात आहे का ? असा प्रश्न आता पुन्हा उपस्थित होत आहे. कारण खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघात नव्याने १३ पोस्ट कार्यालय निर्मिती करण्याची मागणी केली होती.त्यांच्या मागणीला नुकतीच मंजूरी मिळाली असल्याची माहिती खा.मोहिते पाटील यांनी सोशल मिडियाद्वारे दिलीय. 


मात्र,  लोकसभा मतदारसंघात नव्याने मंजूर झालेल्या १३  पोस्ट कार्यालयांमध्ये फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील एकाही गावाचा समावेश नसल्याचे ठळकपणे दिसून येते. परिणामी साहजिकच खा.मोहिते पाटील हे जाणीवपूर्वक फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ दुर्लक्षित ठेवत आहेत का ? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतोच. लोकसभा निवडणुकीत फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ज्या मतदारांनी मोहिते पाटील यांना मतदान केले. त्यांच्यात देखील ह्या निर्णयामुळे साहजिकच नाराजीचा सूर उमटणार आहे. तर ज्या मतदारांनी रणजितसिंह ना.निंबाळकर यांना मतदान केले. त्या मतदारांच्या विकासकामांच्या अपेक्षा खा.रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्याकडून वाढलेल्या देखील दिसून येतात. कारण नुकतेच त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यामुळे माजी खासदार असूनही रणजितसिंह ना. निंबाळकर यांचा अद्याप दिल्लीत वट कायम असल्याचे अधोरेखित झाले .त्यांनी आता फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दुर्गम भागात नव्याने पोस्ट कार्यालय मंजूर करून आणण्याची  साहजिकच अपेक्षा त्यांचा मतदार करण्यास सुरुवात करू शकतो.


मंत्री जयाभाऊला एक दणका आवश्यक होता..! हितचिंतकांनी केले मत व्यक्त..!

सातारा: विरोधकांना रावणाची उपमा देणारे मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाढता अहंकार  रावणाच्या दिशेने वाटचाल करत असताना नियतीने त्यांना वेळीच...